केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेलेल्या वादग्रस्त विधानामुळे काल दिवसभर गोंधळ निर्माण झालेला होता. भाजपा-शिवसेना आमनेसामने आले होते. तर, नारायण राणे यांना अटक झाल्याने, रात्री उशीरापर्यंत त्यांना महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर होईपर्यंत हा गोंधळ सुरू होता. मात्र नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना, शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटेकेबाबत बोलताना दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलतान ही माहिती दिली आहे. तसेच, काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तर, या व्हिडीओमध्ये अनिल परब पोलिसांना कोणताही उशीर न करता नारायण राणे यांना अटक करा असा आदेश देत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती.
यावर आता, भाजपा अनिल परब यांच्याविरोधात कोर्टात जाणार आहे. शिवेसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा आदेश दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यावरून भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने नालासोपारा येथे तक्रार दाखल केली आहे. नालासोपारा येथील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत यांनी तक्रार दाखल केली आहे.

अनिल परब यांनी दिले होते नारायण राणेंच्या अटकेचे आदेश?; व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

”अनिल परब यांच्याबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, त्यांची जी व्हिडिओ क्लीप माध्यमांवर आली आहे, ती संपूर्ण जगाने पाहिली. की किती कायदा हातात घेणं चाललंय. किती अरेरावी चालली आहे. पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललेलं आहे. यांच्यात हिंमत नाही सरकार चालवण्याची. त्यामुळे आम्ही ती क्लिप घेऊन न्यायालयात जाणार आहोत. हे कशात बसतं हे विचारणार आहोत.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तसेच, ”काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं आहे. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करत नाही. राणेंची तब्येत खराब झाली आहे. जेवतांना ताट हिसकावून घेतलं हे अमानवीय आहे. पोलिसांत बसून ठेवलं, त्यामुळे एक दिवस आराम करतील. लवकरच जन आशीर्वाद यात्रा निघेल.” अशी देखील चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे.