धुळ्यातही सत्तेचा ‘आयाराम मंत्र’ यशस्वी; २७ पैकी १७ पालिका ताब्यात

सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई

महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व २७ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चक्र सोमवारी पूर्ण झाले. आयारामांचा वापर करत का होईना पक्षाची सत्ता आणण्याची यशाची मालिका धुळे महापालिकेतील स्पष्ट बहुमताच्या निमित्ताने कायम राहिली आहे. आता २७ पैकी १७ महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आल्या असून, राज्यातील दोनतृतीयांश महापालिकांमध्ये स्वबळावर किंवा युतीच्या माध्यमातून भाजपचा झेंडा फडकत असल्याचे राजकीय चित्र आहे.

लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्पष्ट बहुमताचे सरकार आले. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे बहुमत हुकले, पण इतर राजकीय पक्षांना संख्याबळात मागे टाकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली. महाराष्ट्रात एकूण २७ महापालिका आहेत. फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या सर्व महापालिकांच्या निवडणुकांचे सत्र २०१५ मध्ये सुरू झाले. ते आवर्तन सोमवारी धुळे व अहमदनगरच्या निकालानंतर पूर्ण झाले. २०१५ मध्ये पाच महानगरपालिकांच्या निवडणुकींपैकी औरंगाबाद व कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप युतीच्या माध्यमातून सत्तेत राहिली. २०१६ मध्ये एकाही महानगरपालिकेची निवडणूक नव्हती. २०१७ मध्ये १८ महापालिकांच्या निवडणुकीत ११ ठिकाणी भाजपला सत्ता मिळाली. त्यानंतर २०१८ मध्ये चार महापालिकांपैकी सांगली, जळगाव व धुळे अशा तीन ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली.

२७ पैकी १६ महापालिकांमध्ये भाजपची कुठे स्वबळावर तर कुठे शिवसेना-इतरांच्या मदतीने सत्ता होती. त्यात धुळ्याची भर पडून ती संख्या १७ झाली आहे. शिवाय अहमदनगरमध्ये शिवसेना-भाजप युती झाल्यास ती संख्या १८ वर पोहोचेल. त्यामुळे राज्यातील एकूण महापालिकांपैकी दोनतृतीयांश महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकत असल्याचे चित्र आहे.

राज्यातील २७ महापालिकांच्या निवडणुकांअंती भाजपचे सर्वाधिक सुमारे ११०० नगरसेवक निवडून आले आहेत. मालेगावमध्ये भाजपने खाते उघडले.

भिवंडी महापालिकेत सत्ता मिळाली नसली तरी नगरसेवकांची संख्या दुप्पट झाली. राज्यातील २७ पैकी २६ महानगरपालिकांमध्ये भाजपच्या नगरसेवकांची संख्या आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत वाढली आहे, तर वसई-विरार महापालिकेत ही संख्या कायम राहिली आहे.

अर्थात, बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने पक्षाबाहेरील आयारामांना मोठी संधी देत हे विजयाचे समीकरण जुळवले आहे.

नगरपंचायत-नगरपरिषदत निवडणुकीतही अव्वल

राज्यातील सहा नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुकीतही भाजपने तीन ठिकाणी सत्ता मिळवली आहे. नांदेड जिल्ह्य़ातील लोहा, नागपूरमधील मौदा आणि जळगावमधील शेंदूर्णीचा त्यात समावेश आहे. यवतमाळमधील नेर-नबाबपूरमध्ये शिवसेनेला, चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत काँग्रेसला तर आणि वाशिममधील रिसोड येथे स्थानिक आघाडीला सत्ता मिळाली. या सहा नगरपालिकांतील एकूण १०९ पैकी सर्वाधिक ३७ जागा भाजपने जिंकल्या आहेत.