राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यांत ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला जोरदार यश मिळाले. आज लागलेल्या निकालानुसार, भाजपाने १०४ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला, अशी माहिती भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

“एकूण जाहीर झालेल्या निकालांनुसार, ५ हजार ७२१ ठिकाणी यश मिळवत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. सत्तेत असलेल्या तीनही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवूनही त्यांना भाजपाच्या आव्हानांचा सामना करता आलेला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी आखलेल्या योजना तसेच मोदी सरकारने प्रत्यक्षात आणलेल्या अंत्योदयाची योजना यामुळे ग्रामीण भागातील जनतेने भाजपावर विश्वास प्रकट केल्याचे दिसून आले. अनैतिक पध्दतीने आघाडी करून सत्ता स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवरचा रोष आणि उदासीनता जनतेने या निवडणुकीतून दाखवून दिली”, अशी भावना उपाध्ये यांनी व्यक्त केली.