दिगंबर शिंदे

ज्या पद्धतीने भाजपने मित्रपक्षांना बरोबर घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले तरीही याच्यापासून बोध न धेता मागच्या पानावरून पुढे सुरू अशीच धारणा प्रस्थापितांची दिसत आहे. याचाच लाभ भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती घेण्याच्या प्रयत्नात आहे. फडणवीस सरकारला विधानसभेत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची रणनीती अवलंबली जात असली तरी विरोधकामध्ये फूट कशी पडेल आणि या फुटीचा लाभ कसा उठविता येतो याकडे पाटील यांचे लक्ष आहे.

आमदार जयंत पाटील यांचा वाळवा हा पारंपरिक मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये गेल्या सहा निवडणुका त्यांनी एकहाती जिंकल्या आहेत. यामुळे पाटील यांना पराभूत करण्यासाठी भाजपने गेल्या चार वर्षांपासून मोच्रेबांधणी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून तत्कालीन मित्र असलेल्या  राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बरोबर घेऊन इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्यात आली. एकेकाळचे आमदार पाटील यांचे निकटचे सहकारी असलेल्या निशिकांत पाटील यांना नगराध्यक्षपदासाठी मदानात उतरविले. यासाठी पक्षाचे निष्ठावंत कार्यकत्रे विक्रम पाटील यांनाही सबुरीचे धडे देण्यात आले. थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये विजय पाटील यांना पराभूत करून निशिकांत पाटील यांचा विजय होताच आमदार पाटील यांना पराभूत करता येऊ शकते, असा विश्वास भाजप नेतृत्वामध्ये निर्माण झाला.

शहरात राष्ट्रवादीची मते कमी झाली असली तरी मिळालेली सर्वच ताकद भाजपचीच असल्याचा समज पक्षाने करून घेतला. बेरजेचे राजकारण करीत असताना शिवसेनेचे आनंदराव पवार, काँग्रेसचे सी.बी. पाटील, वाळव्याचे नायकवडी, पेठ नाक्यावरील महाडिक ग्रुपसोबत होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नेते एकीकडे आणि मतदार एकीकडे असे चित्र असल्याने पुन्हा पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राखण्यात जयंत पाटील यांना यश आले. काही ग्रामपंचायतीत सत्ता बदल करण्याचा भाजपाचा प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही.

एकीकडे आमदार पाटील यांची कोंडी करण्याचे आणि मतदारसंघामध्ये अडकवून ठेवण्याचे धोरण भाजप आखत असताना विरोधी आघाडीमध्ये फूट पडली आहे. मतांच्या बेरजेत असलेले राजू शेट्टी हे आता राष्ट्रवादीसोबत आहेत, तर एकसंघ आघाडी असल्याचे सांगणारे राज्यमंत्री खोत यांच्या नेतृत्वाच्या मर्यादाही आता स्पष्ट होत आहेत. गेल्या आठवडय़ात आमदार पाटील यांच्या विरोधकांची मोट पुन्हा बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. मात्र या शिष्टमंडळाच्या भेटीपासून नगराध्यक्ष पाटील यांना दूर ठेवण्यात आले होते. तसेच राज्यमंत्री खोत यांचा राबता नगराध्यक्षापेक्षा विक्रम पाटील यांच्या वाडय़ावर जादा दिसत आहे. गौरव नायकवडी, राहुल महाडिक, भीमराव माने या मंडळींना सोबत घेऊन होत असलेली मोच्रेबांधणी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाटील विरोधकांची ताकद विभागणीचीच नांदी म्हटले तर चुकीचे कसे म्हणता येईल.

जागावाटपाची कसोटी

वाळवा मतदारसंघ हा पूर्वीच्या युतीमध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला होता. आता जिल्हय़ातील सांगली, मिरज, जत, शिराळा हे चार मतदारसंघांत भाजपाचे आमदार आहेत, तर खानापूर-आटपाडीमध्ये शिवसेनेचे अनिल बाबर आमदार आहेत. हे पाच मतदारसंघ वगळून उर्वरित म्हणजे, तासगाव-कवठेमहांकाळ, पलूस-कडेगाव आणि वाळवा या तीन मतदारसंघांबाबतच युतीचे जागावाटप होणार आहे. यापकी तासगाव, पलूस आणि वाळवा हे तिन्ही मतदारसंघ युतीच्या काळात शिवसेनेकडे होते. आताही ताकद नसली तरी सेनेकडून या मतदारसंघाची आग्रही मागणी होणार आहे. गंमत अशी की, तासगाव-कवठेमहांकाळमधून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, पलूस-कडेगावमधून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जागावाटप करणे कसोटीचे आहे. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांच्यावर आहे, सेनेने वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला तर शिवसेना कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे दिव्य कसे पार पडते हे पाहणेही गरजेचे आहे.

विधानसभा निवडणुकीची मोच्रेबांधणी सुरू असतानाच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनर ओळख असलेल्या सांगलीतील काँग्रेसअंतर्गत असलेले मतभेद मिटण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. उमेदवारी मागणी अर्ज दाखल करण्यापूर्वीच हे मतभेद जिल्हा कार्यकारिणीच्या बठकीत उघड  झाले. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना लोकसभेच्या उमेदवारीवेळी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी विधानसभेचा शब्द दिला असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार त्यांनी माध्यमांनाही तसे सांगितले. मात्र उमेदवारीची मागणी करण्यापुर्वीच सांगलीतील दादा गटाकडून त्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले. कोणालाही उमेदवारी मिळाली तर आम्ही सोबत आहोत असे सांगण्याची वेळ काँग्रेसवर आली असताना गटबाजी कायम राखण्यातच काँग्रेसचे कार्यकत्रे मशगूल आहेत. हीच भाजपची खरी ताकद मानली गेली तर त्यात चुकीचे काय?

याचेच प्रत्यंतर मिरज मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळते, निवडणुक जवळ आली की काही मंडळी उगवतात आणि माजी पदाधिकारी असल्याचे सांगत उमेदवारीवर दावा करतात. एरवी काँग्रेसचे काय चालले आहे याकडे न पाहणारे पंचवार्षकि जत्रा आली की मिरजेत येऊन चार-दोन कार्यकत्रे घेऊन कार्यक्रमाचा धडाका लावतात. या वेळीही सर्वाधिक म्हणजे १० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.