राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात भाजपासाठी धक्कादायक निकाल लागला. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी तब्बल 30 हजारांहून अधिक मताधिक्य घेत भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “विश्वास ठेवा मी ‘त्या ‘क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही. हा पराभव ‘पंकजा गोपीनाथ मुंडेंचा’ आहे, कारण तो हवा होता अनेकांना म्हणूनच झाला असावा. खूप काही जिल्ह्यासाठी स्वप्न होती ती राहिली सल एवढीच आहे. चला मग रजा घेते,सामाजिक कर्तव्यातून नाही पण पराभूत लोकप्रतिनिधी म्हणून… पत्ता कळवते…’ , असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे व्हायरल पोस्ट –
मी माझा पराभव मान्य केला असून मी लागलीच माध्यमातूनही त्याचा स्वीकार केला आहे ..
असं सर्व का झालं यावर मी चिंतन करेन लोकांना जाऊन भेटेन ही ..
आता या विषयाला सर्वांनी विराम द्यावा..कोणी कोणावर आरोप करू नये, जबाबदारी ढकलू नये, निवांत आपली दिवाळी कुटुंबा समवेत साजरी करावी…
राजकारणात सर्वेसर्वा असतात मतदार, त्यांचा निर्णय अंतिम असतो.. तो योग्य का अयोग्य यात चर्चा नसतेच ..तो अंतिम असतो बस्स!!…
ज्यांनी मतदान केलेलं असतं त्या लोकांसाठी तो निर्णय योग्यच असतो!!!
मी माझ्या प्रचाराच्या शेवटच्या सभेत स्पष्ट केलं होतं “मला मुक्त करा किंवा स्वतः मुक्त व्हा” ..
या राजकारणात मी यशस्वी होणं हा ही पराभव आहे असंही मला वाटत राहिलं….
19 ऑक्टोबरला 6 वाजता प्रचार संपला, नंतर मी घरी गेले ते सरळ मतदानासाठीच बाहेर पडले 21 तारखेला सकाळी ..
माझ्या निवडणुकीत ऐन महत्वाच्या दिवशीच मी घरी बसून राहिले ..गोपीनाथ गड येथे साहेबांचे दर्शन घेतले मध्ये आणि थेट मतदानाच्या सकाळीच बाहेर पडले ..
मला मतं मिळाली नसतीलही ,मला मन जिंकताही आली नसतील पण एक मात्र नक्की आहे ,’असत्य मला वागता आलं नाही’हे शत्रूही कबूल करेल.
या पोस्ट च्या खाली येणारे ट्रोल विरोधक जाहीरपणे नाही पण एकांतात मान्यच करतील ‘ताईना खोटं नाही जमलं…’
विश्वास ठेवा मी ‘त्या ‘क्लीप मधील वाक्याने जी घायाळ झाले ते उठलेच नाही.
मी सर्व प्रहार आणि संघर्ष भोगले पण हा वार जिव्हारी लागला आणि ते जर बनावट असतं तर मी काही प्रभावित नसते झाले हे ही नक्की ..इतकी मी प्रगल्भ नक्कीच आहे हो ..
मंचावर त्या दिवशी मी खूप सावरलं स्वतःला,
मीडिया ही गेला होता.. मी काही प्रवेश ही घेतले पण गाडीच्या दिशेने जाताना कोसळले, त्याबद्दल जरा अवघड वाटत आहे ..
त्याचा अर्थ घेणारे घेतीलच पण जमलं तर विश्वास ठेवा ..माझ्या स्वाभिमानी स्वभावाला खूप लागलं, माझं कोलमडून पडणं अगदी निवडणूक हरल्या पेक्षाही लागलं .
मी आजवर राजकीय जीवनात जे केलं ते लोकांसाठी त्या सर्व भावना आणि स्व.मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते मी शांत आहे आणि मुक्त झाली आहे .. निकालाची जवाबदारी फक्त माझी आहे !
हा पराभव ‘ पंकजा गोपीनाथ मुंडेंचा ‘ आहे कारण तो हवा होता अनेकांना म्हणूनच झाला असावा..
खूप काही जिल्ह्यासाठी स्वप्न होती ती राहिली सल एवढीच आहे ..
फक्त साऱ्यांना वेठीला धरून राजकारण बंद व्हावं ..कोणीतरी शाश्वत विकासावर बोलावं आणि तो करावा ..
नाहीतर उद्या लोक म्हणतील “ताई फोन उचलत नव्हत्या, भेटत नव्हत्या अशी चर्चा ऐकली होती, पण न फोन करता विकास दारात येत होता हे विचारात घेतलंच नाही.”
विकास निरपेक्ष आणि शाश्वत असावा ही इच्छा कोणीही पूर्ण करावी, त्यांना माझ्या शुभेच्छा ..
चला मग रजा घेते,सामाजिक कर्तव्यातून नाही पण पराभूत लोकप्रतिनिधी म्हणून …
पत्ता कळवते ..माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील ..काळजी घ्या स्वतःची आणि माझ्या जिल्ह्यातील विकासाची ..