रब्बी लागवडीसाठी एकीकडे पालघर जिल्ह्यात हरभरा व काळ्या तिळाच्या लागवडीचे प्रयत्न सुरू असताना सिंचनाखाली असलेल्या डहाणू भागातील शेतकऱ्यांनी औषधी गुणधर्म असणाऱ्या काळा भाताची लागवड करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. जिल्ह्यात  आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, डहाणू यांचेमार्फत आत्मा योजनेअंतर्गत कासा व वाणगाव कृषी मंडळातील शेतकऱ्यांना उन्हाळी भातपीक प्रात्यक्षिकासाठी  ‘बर्मा ब्लॅक चकाऊ’या जातीच्या काळा भात बियाण्याच्या वाटपाचा कार्यक्रम विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग प्रमोद लहाळे यांच्या हस्ते वेती व निकावली येथे पार पडला. यावेळी तालुका कृषी अधिकारी डहाणू संतोष पवार उपस्थित होते. पेठ, नगर, नासिक भागात काळा भाताचे उत्पादन घेतले जाते. डहाणू तालुक्यातील उन्हाळी भातशेती करणाऱ्या गंजाड, निकाणे, रानशेत, ओसवरी, मुरबाड, धामटणे, पेठ व तवा या सात गावांमधील २५ शेतकऱ्यांना पाच किलो प्रति शेतकरी याप्रमाणे काळा भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले असून   चारसूत्री पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन  आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून २० गुंठे जमिनीवर या  वाणाची लागवड होणार असून साडेबारा एकर जमिनीवर उत्पादित होणाऱ्या भाताचा नंतर बियाणे म्हणून वापर होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास  शेतकऱ्यांना एक पर्यायी भात बियाणे निर्माण होईल अशी आशा  लहाळे यांनी व्यक्त केली. काळा भात बियाणे जिल्ह्यात प्रथमच लागवड होत असल्याने त्याच्या लागवडीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापणाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे असे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले.

प्रति किलो १०० रुपये दर

वाटप केलेले काळा भात बियाणे हे बर्मा ब्लॅक चकाऊ या जातीचे आहे.  हे बियाणे ११० ते १२० दिवसांचे आहे. काळा भात वाणाचे हेक्टरी उत्पादन २० ते २५ क्विंटल इतके आहे. काळा भात विक्रीचा प्रति किलो दर ८० ते १०० रुपये इतका असून भाताच्या या जातीमध्ये औषधी गुणधर्म आहेत.  यामुळे  शेतकऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

अनेक आजारांवर गुणकारी

कर्करोग रोखण्यासाठी पूरक असलेले धान्य म्हणून त्याला ओळखले जाते. काही भागात त्याला कर्करोग-लढाऊ तांदूळ असे देखील म्हणतात.  पांढऱ्या तांदळाऐवजी घरगुती व्हेगी बर्गरमध्ये शिजवलेला काळा तांदूळ घालून किंवा ताज्या भाजलेल्या भाज्या आणि आपल्या आवडत्या प्रथिनेसह त्याचे सेवन केले जाते. लठ्ठपणा कमी होतो. तसेच पचनासाठी चांगला, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहे. त्वचा, मेंदू आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे दावा आहे.