करोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठीचा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र करोना आणि लॉकडाउनमुळे महाविद्यालयं बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने रक्त संकलनात अडचणी येत आहेत. त्यामुळे जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

करोनाविरोधातल्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी हे आपलं योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधं, सुविधा यांची कमतरता भासू नये यासाठी शासन स्तरावरुन सर्व उपाय योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र राज्यांमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्त पेढ्यांमध्ये १९ हजार ५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेट लेटच्या २ हजार ५८३ युनिट आहेत. तर मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल इतकाच हा साठा आहे. याच पार्श्वभूमीवर रक्त तुटवडा भासू नये म्हणून राज्यातील राजकीय,धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी करोनाविषयीची काळजी घेऊन छोट्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं असंही आवाहन करण्यात आलं आहे.

स्वैच्छिक रक्तदात्यांनीही जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावं. करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. करोनाच्या काळात रुग्णांना जीवदान देण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.