शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. त्यानंतर तिच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, तिच्या या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीनं तिच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. यावरून कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईला रक्ताचं व्यसन लागलं असल्याचं वक्तव्य तिनं केलं. शिवसेनेच्या महिला आघाडीनं कंगनाच्या वक्तव्याच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं. याला उत्तर देताना कंगनानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं.

” सुशांत आणि साधुंच्या खुनानंतर आता प्रशासनानवरच्या माझ्या मतानंतर माझ्या पोस्टरला चप्पल मारण्यात आल्या. मुंबईला आता रक्ताचं व्यसन लागलं आहे असं वाटतंय,” अशी टीका कंगनानं केली. तिनं शिवसेनेच्या महिला आघाडीच्या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवरून टीका केली.

“१०० वर्षात मराठ्यांचा इतिहास सांगणारा एक चित्रपट केला नाही. मी इस्लाम डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये आपला जीव आणि करिअर पणाला लावलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट केलं. आज महाराष्ट्राच्या या ठेकेदारांना विचारा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?,” असंही कंगना म्हणाली. तिनं या सोबत आपल्या चित्रपटातील एक फोटोही शेअर केला आहे. “महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही. ज्यानं मराठीचा अभिमान बाळगला आहे त्याचा महाराष्ट्र आहे. मी सांगते आहे मी मराठा, करा जे काही करायचं आहे,” असंही ती म्हणाली.