बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भिवंडी इमारत दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या घरावर बेकायदेशीरपणे कारवाई केली जात होती. त्यावेळी तेवढं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर जवळपास ५० लोक जिवंत असते असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाने ट्विटरच्या माध्यातातून टीका केली असून यावेळी तिने दुर्घटनेची तुलना पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी केली आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “उद्धव ठाकरे, संजय राऊत…जेव्हा माझं घर बेकायदेशीरपणे तोडलं जात होतं, तेव्हा तितकं लक्ष या इमारतीवर दिलं असतं तर आज जवळपास ५० लोक जिवंत असते. पाकिस्तानने केलेल्या पुलवामा हल्ल्यात इतके जवान नाही मारले गेले जितके निष्पाप तुमच्या निष्काळजीपणामुळे गेलेत. मुंबईचं काय होणार देवालाच माहित”. कंगनाने ट्विटमध्ये महापालिकेलाही टॅग केलं आहे.

भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. दुर्घटनेतील मृतांची संख्या ४१ वर पोहचली असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसंच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.