बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना अखेर मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने भुजबळ यांचा तुरुंगातून पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते तुरुंगातून बाहेर येतील, अशी माहिती सूत्रांनी आहे.

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्याप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून (ईडी) १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. भुजबळ यांची मुंबईतील ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरू होती. छगन भुजबळ यांनी आपण चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते मात्र, सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.

भुजबळांसह १७ जणांवर आरोपपत्र

महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स या व्यवहारातून भुजबळ कुटुंबीयांना मिळालेल्या ८७० कोटी रुपयांबाबत महासंचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

जामीन मिळणं हा त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचे नेते भुजबळ यांच्या संपर्कात होते असे ते म्हणाले. सरकारनं त्यांना जामीन मिळू नये असा खूप प्रयत्न केल्याचे सांगताना अखेर कायद्यानुसार त्यांना जामीन मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भुजबळ यांना एका प्रकरणात जामीन मिळाला होता, व दुसऱ्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नव्हता. कालिना भूखंड घोटाळाप्रकरणी त्यांना जामीन मिळाला होता, मात्र आर्थिक अफरातफरीप्रकरणी जामीन मिळाला नव्हता, तो ही आता मिळाल्यामुळे त्यांचा कारागृहबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुजबळ हे बडे व्यक्तीमत्त्व असल्यामुळे त्यांना जामीन मिळाला तर ते पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतात असा दावा सरकारी वकिलांनी केला होता, मात्र तो मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य मानला नाही व त्यांना जामीन दिला आहे.