प्रदीप नणंदकर, लातूर आजार, रोगांचा फैलाव करणाऱ्या डासांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न उभा राहतो. विशेषत: सार्वजनिक ठिकाणच्या एखाद्या जलाशयावरील डास रोखण्याचे आव्हान समोर उभे असते. मात्र, लातुरात आता जलाशय किंवा एखाद्या डबक्यातील डासांचा बंदोबस्त करण्यासाठी गंबुशिया माशांकडे पर्याय म्हणून पाहिले जात असून शहरात या माशांचे पुनरुत्पादन केंद्र तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपातील सूत्रांकडून मिळाली. गेल्या दोन महिन्यांपासून लातूरवासीय चिकनगुनिया, डेंग्यूच्या त्रासाने त्रस्त आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने या आजाराचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम प्राधान्याने राबवली जात आहे. त्यात आता भाजपचे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी डास खाणारे दीड हजार गंबुशिया मासे आणून बसवेश्वर चौकातील जलाशयात सोडले आहेत. या माशांचे खाद्यच डासांची अंडी आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होईल, असा दावा केला जातो. शहरातील बसवेश्वर चौकात महाराष्ट्र सहकारी बँकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले असून तेथे पाण्याचे कारंजे आहेत. या जलाशयात सोमवारी १५०० गंबुशिया मासे सोडण्यात आले आहेत. हे मासे शहरातील अन्य जलाशयातही सोडले जाणार आहेत. त्यासाठी लातुरात माशांचे पुनरुत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे मनपातील सूत्रांकडून सांगण्यात आले. साठवलेल्या पाण्यात डास होऊ नयेत यासाठी महापालिकेच्यावतीने अॅबेटिंग केले जाते. अॅबेटिंगनंतर ९ ते ४५ तासापर्यंत डास मरतात. मात्र नव्याने पुन्हा डास अंडी घालू शकतात. त्यासाठी अॅबेटिंगचा खर्च करावा लागतो. त्याऐवजी लोकांच्या आवश्यकतेनुसार या माशांचे वितरण केले तर आपोआपच डास कमी होतील, असा दावा केला जातो.