एखादी गोष्ट जास्त झाली की त्याची किंमत राहात नाही. आपल्याकडे लोकसंख्या जास्त असल्यामुळे माणसांच्या मरणाची किंमतच राहिलेली नाही. एकदोन दिवस प्रश्न विचारले जाणार आणि नंतर सगळे विसरून जाणार, अशी भावना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गावरील राजेवाडी फाट्याजवळील जुना पूल मंगळवारी रात्री कोसळला. या दुर्घटनेत दोन एसटीबससह पाच ते सहा वाहने सावित्री नदीत बुडाली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, तो पूल ब्रिटिशांनी बांधला. त्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांच्याकडून राज्य सरकारला पत्रही आले होते. जे हा देश सोडून गेले त्यांना देशातील पुलांची काळजी आहे. पण राज्य सरकारने यासंदर्भात योग्य पावले उचलली नाहीत. बेजबाबदारपणा दाखवला आणि ही दुर्घटना घडली. एखादी गोष्ट आपल्याकडे जास्त झाली की त्याची किंमत राहात नाही. लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपल्याकडे मरणाची किंमतच राहिलेली नाही. एक-दोन दिवस चर्चा होते आणि नंतर लोक सगळं विसरून जातात.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, लोकांशी संबंधित जे महत्त्वाचे विषय आहेत. त्यावर चर्चा टाळण्यासाठीच वेगळ्या विदर्भासारखा विषय उपस्थित केला जातो. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची एकमेकांना साथ आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. त्यामुळे विदर्भाचा जो काही अनुशेष आहे तो त्यांनी भरून काढावा आणि विदर्भाचा विकास करावा. त्यांना कोणीही अडवले नाही.
वस्तू व सेवा कर विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले की केंद्राकडे जमा होणार कररुपी निधी मुंबईसारख्या शहरांना वेळेत मिळाला नाही तर या शहराची व्यवस्था कोलमडेल. याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 4, 2016 12:39 pm