|| दिगंबर शिंदे पुराने भाजीपाल्याचे दुर्भिक्ष्य, कृष्णाकाठच्या वांग्याला १६० रुपयांचा भाव महापुराने भाजीपाला शेती पाण्याखाली गेल्याने सांगलीच्या बाजारात सध्या तीव्र भाजीपाला टंचाई भासत आहे. कृष्णाकाठची प्रसिद्ध वांगीही सध्या दुर्मिळ झाली असून त्यांचा दर चिकनपेक्षा महाग झाला आहे. श्रावणामुळे मागणी कमी झाल्याने चिकनचे दर उतरले असून टंचाईमुळे वांग्याचा भाव वधारला आहे. सांगलीच्या बाजारात सध्या एक किलो वांगी घेण्यासाठी १६० रुपये मोजावे लागत आहेत तर, पोल्ट्रीचे चिकन १२० रुपये किलोने विकले जात आहे. कृष्णाकाठच्या गाळवट जमिनीत काटेरी आणि गोल वांगी पिकतात, या वांग्याला कुडची वांगे असे स्थानिक पातळीवर म्हटले जात असून या वांग्याची वेगळी चव असल्याने बाजारात त्याला कायम मागणी असते. वांग्याच्या या वाणाचे उत्पादन प्रामुख्याने भिलवडी, अंकलखोप, दुधगाव, समडोळी, आणि कोल्हापूर जिल्ह्य़ातील कोथळी, दानोळी, नांदणी परिसरात केले जाते. नुकत्याच आलेल्या महापुराने मळीच्या रानात केलेले वांग्याचे फड सलग दहा दिवस पाण्यात राहिल्याने वांग्याची झाडे सडून गेली. तशातच सततचा पाऊस पडल्याने पाण्यापासून कोरडय़ा असलेल्या फडावर किडीचे प्रमाण वाढल्याने उत्पादन कमी झाले आहे. यामुळे बाजारात वांग्याची उपलब्धता कमी झाली असून दर भडकले आहेत. ठोक बाजारात १० किलो वांग्याला हजार ते बाराशे रुपये दर मिळत असून किरकोळ बाजारात १६० रुपये किलो असा दर आहे. चालू महिना श्रावण महिना असल्याने अनेक घरातून मांसाहर वज्र्य केला जात असल्याने पोल्ट्रीच्या चिकनला मागणीही कमी झाली आहे. १६० रुपये किलो दर असलेले चिकन सध्या १२० रुपये किलोने विकले जात आहे. यामुळे चिकनपेक्षा वांगी महाग अशी बाजारात स्थिती आहे. वांगी दिसेनाशी सध्या महापुरानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक खूपच मंदावली आहे. पूरग्रस्त हद्दीबाहेरच्या भागातून सध्या थोडापार भाजीपाला शहरात येतो. मात्र कृष्णाकाठची वांगी मात्र आता दिसेनाशीच झाली आहेत. चुकून कुठे बाजारात आली तर ही वांगी भाव खाऊन जातात. - इलाई बागवान, वांग्याचे व्यापारी सगळे पीक सडून गेले लाखभर रुपये खर्च करत दोन एकरात वांग्याचे पीक उभे केले. झाडाला फळेही चांगली धरली होती. आता माल बाजारात जाण्यास सुरुवात होणार तेवढय़ात या महापुराने शेती गिळंकृत केली. सलग आठ दिवस रानात पाणी होते. तयार केलेले सगळे पीक सडून नष्ट झाले. - रामचंद्र पाटील, सांगली भाजीपाल्याचे दर भडकले महापुराने भाजीपाल्याचेही नुकसान झाले असल्याने बाजारात भाजीपालाच उपलब्ध होत नाही. यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. पूरग्रस्त सांगलीच्या बाजारात फळभाज्यांचे प्रति किलो दर असे आहेत - वांगी १६० रुपये, दोडका १००, भेंडी १२० सिमला मिरची ६० ते ८० रुपये. तर रानभाज्या उपलब्ध होऊ लागताच पावसाने जोर धरल्याने रानभाज्याही यंदा गायब झाल्या आहेत. एरवी गौरीच्या सणापर्यंत उपलब्ध असलेल्या भाज्याही बाजारातून गायब झाल्या आहेत. मेथीची जुडी ३० रुपये, पालक, शेपू २० रुपये असा शुक्रवारी दर होता. बटाटा ३० रुपये कांदा २० ते ३० रुपये किलो असे दर आहेत, तर देशी कोथिंबीर बाजारात तुरळक असून तिचा दर ३० ते ४० रुपये झाला असून घटप्रभा येथून येत असलेल्या संकरित कोथिंबीर जुडीचा दर १५ ते २० रुपये आहे. या तुलनेत पूर्व भागातून येत असलेला टोमॅटो मात्र स्वस्त असून सांगलीच्या किरकोळ बाजारात दहा ते वीस रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात आहे.