सख्ख्या भावासह भावजयीवर प्राणघातक हल्ला करून सोने-चांदीसह एक लाखाची रोकड, मोबाइल फोन, महत्त्वाची कागदपत्रे लुटून नेल्याप्रकरणी दोघांवर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींची पाठराखण केली जात असल्याचा आरोप जखमी दाम्पत्याने केला आहे. ही खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील इटकूर येथे घडली.

इटकूर येथील ज्ञानदेव लिंबराज गंभीरे व त्यांची पत्नी रविवारी घरामध्ये असताना सुंदर लिंबराज गंभीरे व तुकाराम लिंबराज गंभीरे यांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. तसेच एक लाख रुपये, पाच तोळे सोने, मोबाइल फोन व कागदपत्रे लंपास केल्याची फिर्याद ज्ञानदेव गंभीरे यांनी दिली आहे. दरम्यान, रविवारी घडलेल्या या प्रकारानंतरही पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. आरोपींना अद्याही अटक झालेली नाही. त्यामुळे कळंब पोलीस आरोपींची पाठराखण करत असल्याचा आरोप ज्ञानदेव गंभीरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. सुंदर व तुकाराम यांनी माझे व पत्नीचे हात-पाय बांधून विहिरीतून शेंदले. जबर मारहाण केली. यात दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांच्या मानेवर दोरीचे तर पाठीवर व अंगावर मारहाणीचे व्रण आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असताना पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असून याप्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.