मूल शहराजवळ असलेल्या चंद्रपूर मार्गावरील टेकडीवर स्थापीत केलेली तथागत गौतम बुद्धाची मूर्ती अज्ञात समाजकंटकानी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास भन्ते संघवंश सांयम वंदने करीता गेले असता त्याठिकाणी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती नसल्याचे दिसून आले. त्यांनी बुद्धगिरीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तात्काळ यासंबंधी माहिती दिली. पोलिसांत यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे मूल शहरातील बौद्ध बांधवांकडून समाजकंटकांचा निषेध करण्यात येत आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे . मूल शहराला लागून टेकडी आहे. अनेक वर्षापुर्वी या टेकडीवर बुद्धाचे पुरातन शिल्प म्हणजेच बुद्ध मूर्ती आढळली. ही बुद्धमुर्ती तिथे अनेक वर्षापासुन असून त्या ठिकाणी दरवर्षी मोठे उत्सव साजरे होतात. या ठिकाणी उत्सवात मोठे यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून बौद्ध उपासक-उपासिका या ठिकाणी बुद्धाला वंदन करण्यास येतात. चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवाचे हे मोठे वंदन स्थळ आहे. परंतु काही समाजकंटकाच्या माध्यमातून मंगळवारी रात्री पुरातन असलेलं शिल्प म्हणजेच बुद्ध मर्ती चोरण्याचं कटकारस्थान करुन बुद्ध मुर्ती चोरण्यात आली आहे. यातून संमाजकंटकाकडून करण्यात आल्याचा कृत्याचा बुद्ध टेकडीवर एकत्र येऊन निषेध केला जात आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांनी सदर प्रकाराचा निषेध नोंदवला असुन ज्या कोणी समाजकंटकाने हा प्रकार केला त्याचा शोध लावून योग्य शासन करावे असा आदेश पोलिसांना दिला आहे.