बोईसरजवळील गावात ग्रामस्थांनी काम रोखले

पालघर : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी मान कल्लाळे येथे आलेल्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्यास ग्रामस्थ तसेच आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने हे अधिकारी सर्वेक्षण केल्याविना परत गेले.

१३ ते १५ जानेवारी दरम्यान पालघर येथे झालेल्या आदिवासी सांस्कृतिक महा संमेलनादरम्यान आदिवासी भागातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन आणि इतर प्रकल्पांना आदिवासी एकता परिषदेतर्फे विरोध तीव्र करण्यात येणार असल्याची भूमिका आदिवासी एकता परिषदेतर्फे मांडण्यात आली होती. हे संमेलन संपून दोन दिवस उलटले नाही, तेवढय़ात बुलेट ट्रेनच्या संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी बोईसरजवळील मान कल्लाळे भागात आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली.

त्यानंतर गावातील आदिवासी आणि आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, शशी सोनवणे, नीता काटकर, मोरेश्वर दौडा घटनास्थळी पोहोचले. या प्रकल्पाला आपला विरोध कायम असल्याचे त्यांनी अधिकारी वर्गाशी चर्चा करून सांगितले. बुलेट ट्रेन हा देशाच्या हिताचा नसून या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेत अनेकदा ठराव झाल्याची माहिती कार्यकर्त्यांनी अधिकारी वर्गाला दिली. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करून देण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण न करताच परतावे लागले. यापूर्वी पाच वेळा अधिकाऱ्यांना सर्वेक्षण न करता परत जावे लागले होते.