करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन असताना मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन एक बडा उद्योजक आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतून महाबळेश्वरमध्ये दाखल झाला आहे. जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून आलेला हा उद्योजक व त्याच्या कुटुंबियांसह २३ जणांवर जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मोठी कारवाई केली आहे.

मुंबईतील मोठे व्यापारी वाधवा हे आपले कुटुंबीय आणि कर्मचारी अशा २३ जणांसह लॉकडाउनचे सर्व नियम धाब्यावर बसवून ५ मोटारगाड्यांमधून आज दुपारी महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. महाबळेश्वरमधील नागरिकांनी त्यांना आपल्या फार्महाऊसवर थांबण्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर प्रशासनाने त्यांना पाचगणीमध्ये उभारलेल्या विलगीकरण कक्षात दाखल केले.

लॉकडाउनचा आणि संचारबंदीचा आदेश तोडल्यामुळे वाधवा कुटुंबावर कारवाई करीत असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. या उद्योगपतीने महाबळेश्वरला येण्यासाठी मंत्रालयातून विशेष परवानगी मिळवली होती. संबंधित उद्योगपतीला परवानगी दिलेली असतानाही सातारा प्रशासनाने त्यांच्यावर धडक कारवाई केली आहे.

सातारा येथे करोनाचे सहा रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर सातारा व कराड येथे उपचार सुरु आहेत. तर दररोज अनेक रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात येत आहेत. लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याभरापासून महाबळेश्वरातील पर्यटन बंद आहे. स्थनिकांशिवाय इतरांनी परिसर सोडून जावे असे आदेश प्रशासनाने काढले होते.

उद्योगपती, व्यापारी आणि अभिनेत्यांना नाकारली होती परवानगी

महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरमध्ये हेलिकॉप्टरव्दारे येण्यासाठी काही उद्योगपती, व्यापारी आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांना जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी परवानगी नाकारली होती.