“अनेकांना भाजपा सोडण्याची इच्छा आहे आणि त्यांना रोखण्यासाठी पार्टीकडून सांगितले जात आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार आहे. मात्र, राज्य सरकार पडणार नाही.” असं एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आपली कन्या रोहिणी आणि निवडक कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. Many people want to leave BJP and to stop them the party says the government (in Maharashtra) is going to collapse, but the government is not going to fall: Eknath Khadse, who joined NCP yesterday after quitting from BJP pic.twitter.com/M2sYwpNfId — ANI (@ANI) October 24, 2020 पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना खडसे म्हणाले, “शरद पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की मी गेली ४० वर्षे ज्या निष्ठेने भाजपाचे काम केले, त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेन. मी भाजपा पक्ष वाढवला, तसाच आता राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवेन. मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन. मला फक्त तुम्हा लोकांची साथ हवी आहे. माझ्या पाठीशी जर कोणी भक्कमपणे उभं राहिलं, तर मी कुणालाही घाबरत नाही!” तसेच, राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची इच्छ होती आणि दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही मला तसाच सल्ला दिल्याचे खडसे म्हणाले. पक्षप्रवेश कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, खासदार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री गुलाबराव देवकर आदी नेते उपस्थित होते.