कॅगचा अहवाल अकाऊंट पद्धतींमधील दोषांमुळे समोर आला आहे असं उत्तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. कॅगच्या अहवालाचा मुद्दा विधानसभेत मांडला गेला. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर आरोप केले. काँग्रेसच्या काळात सर्वाधिक घोटाळे झाल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहेत. शुक्रवारी संध्याकाळीच हा अहवाल समोर आला. राज्यात २०१८ पर्यंत झालेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ लागत नसल्याचं कॅगने अहवालात नमूद केलं आहे. मात्र हा अहवाल अकाऊंट पद्धतीतील दोषांमुळे समोर आला असं उत्तर आज देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

६५ हजार कोटी रुपये खर्च करुन ३२ हजारांपेक्षा जास्त कामांची उपयोगिता प्रमाणपत्रं सादर झालेली नाहीत असं कॅगने म्हटलं आहे. तूर्तास या गोष्टीला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही असं अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र या गोष्टीचा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुढच्या अधिवेशनात हा घोटाळा नव्हता हे सिद्ध करण्याची आम्हाला संधी मिळाली तर आनंद होईल असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अखर्चित रक्कम खर्च झाल्याची प्रमाणपत्रं मिळाली तर चांगलंच घडेल असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.