अकोला : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुलढाणा जिल्हय़ातील चिखली- अमडापूर मार्गावर बुधवारी घडली. जखमींमध्ये दीड वर्षांच्या मुलाचा समावेश असून त्याला उपचारार्थ अकोला येथे हलवण्यात आले आहे. खामगाव तालुक्यातील कांचनपूर येथील परिवार पुणे येथून कारने (एमएच ३० एटी ३००९) मूळ गावी निघाले होते.

दरम्यान, बुधवारी पहाटे अमडापूरनजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरूपे (५०) व प्रीती विलास बहुरूपे (२४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश प्रल्हाद बहुरूपे (६०), स्नेहल श्रीकांत भोजने (२७), विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचारार्थ चिखली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.