रत्नागिरीला गणपती पुळे येथे दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. वर्धा येथे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होती की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर असणाऱ्या रेल्वे पुलाजवळ रात्री साडे अकरा वाजता हा अपघात घडला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातल्या हिवरा गावचे हे तरुण गणपती पुळे येथे निघाले होते. रात्री पुलाजवळ येत असताना त्यांची बोलेरो गाडी तिथेच उभ्या ट्रकवर आदळली. अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

अपघातात वाहनचालक शैलेश पंढरी गिरसावले (२६), आदर्श हरिभाऊ कोल्हे (१७), सूरज जनार्दन पाल (२१) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर यश कोल्हे, भूषण खोंड, शुभम पाल, प्रणय कोल्हे, समीर कोल्हे, मोहन मुंढे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे