जावळी तालुक्यातील मेरुलिंग-मेढा या घाटात एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून मोटार थेट दरीत कोसळली. या भयंकर अपघातामध्ये चालकासह एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

घरगुती व किराणा सामान आणण्यासाठी गाडी मेढ्याकडे(ता जावली) जात होती. गाडीमध्ये एकूण आठ प्रवासी बसले होते. दरम्यान, मेरुलिंग घाटात आल्यानंतर एका अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटूला. त्यानंतर गाडी थेट दरीत कोसळली. यामध्ये चालकासह तीन जण जागीच ठार झाले.

मोटार चालक शिवाजी जगन्नाथ साबळे (वय ४०), लिलाबाई गणपत साबळे (वय ५५), सागर सर्जेराव साबळे (वय ३२) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आलं.

अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात मोटार पूर्ण चेपल्याने दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना खूप परिश्रम घ्यावे लागले.