अहमदनगर- पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळ ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेले सर्व जण हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

जातेगाव फाट्याजवळ अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर रस्त्याच्या कडेला एक ट्रक थांबला होता. मंगळवारी पहाटे या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.  या भीषण अपघातात ओझायर तसनीय अख्तर अन्सारी (वय ३०), फैजल गुलाब रब्बाली अन्सारी (वय २०), इरफान शयशोदोहा अन्सारी (वय २०) अशी या मृतांची नावे आहेत. तर अदनान निहाल अन्सारी (वय २१) हा या अपघातात जखमी झाला आहे.

पहाटेची वेळ असल्याने चालकाला झोप अनावर झाली असावी आणि यातूनच हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.