पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शिराळा पाटीजवळ झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या १० वर्षांच्या नातवाचा समावेश आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

मृत व जखमी एका कुटुंबातील असून हे सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील आहेत. नवनाथ गायकवाड, अलका गायकवाड, सूरज किरण कांबळे अशी मृतांची नावे आहेत. अक्षय गायकवाड आणि गिरज कांबळे हे जखमी आहेत. जखमींवर इंदापूर येथे उपचार सुरू आहेत. हे सर्वजण आलेगाव येथील भैरवनाथ शुगर कारखान्यातील एका मुकादमच्या ट्रॅक्टरवर ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत होते.

दोन दिवसांपूर्वी कारखाना बंद झाला आहे. काही कामानिमित्त ते आलेगाव येथे आले होते. त्यानंतर परत जाताना हा अपघात झाला. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.