चंदगड तालुक्यातील (जि. कोल्हापूर) तिलारी घाटात कार कोसळून झालेल्या अपघातात ५ युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सर्व मृत युवक हे बेळगावचे रहिवासी होते. सुटीचा दिवस असल्याने सर्वजण फिरायला आले होते. दुर्दैवाने या पाचही मित्रांवर काळाने घाला घातला. रविवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास हे युवक तिलारी नजीक असलेल्या कोदाळी येथील लष्कर पाँईंटकडे वॅगन आर कारने (केए ०४ एमबी ४६२०) जात होते. या पाँईंटजवळ आल्यानंतर त्यांच्या कारला ब्रेक लागला नाही. त्यामुळे कार थेट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचही जण जागीच ठार झाले. कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. कारमध्ये दोन मृतदेह अडकले होते. पोलिसांना अखेर कटरच्या साहाय्याने कारचा भाग कापून ते मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी चंदगडला पाठवण्यात आले आहेत. मोहन लक्ष्मण रेडेकर (वय ४०), किसान मुकुंद गावडे (१९), यल्लप्पा एन. पाटील (४५), चालक पंकज उर्फ ज्योतिर्लिंग संपत किळेकर (३९) आणि नागेंद्र सिद्रय्या बाबू गावडे (२९) अशी मृत पर्यटकांची नावे आहेत. पॉईंटपासून काही अंतर पार केल्यावर कार चालकाला दाट धुक्यामुळे रस्त्याचा नेमका अंदाज आला नाही. कार रस्ता सोडून बाजूला असलेल्या दरीत घुसली. ती सुमारे २५० फूट खाली जाऊन कोसळली. यामध्ये हे पाचही पर्यटक जागीच ठार झाले, असे चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी सांगितले. हे पाचही युवक बेळगावमधील एका पतसंस्थेत कामाला होते, असे समजते. सुटीचा दिवस असल्याने सर्वजण फिरायला बाहेर पडले होते. पोलीस आणि कोदाळी गावच्या ग्रामस्थांनी दरीत पडलेले मृतदेह बाहेर काढले.