जिल्हा कॅरीबॅग मुक्त बनविण्यासाठी व बचतगटांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशातून शहरात कापडी पिशवी खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. बचत गटांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कापडी पिशवी विक्री केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते झाले.
येथील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांमध्ये नगरपालिका व महिला आíथक विकास महामंडळाच्या वतीने हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, की व्यापाऱ्यांनी यापुढे दुकानातील साहित्य ग्राहकांना देण्यासाठी या कागदी पिशव्यांचा वापर करून उस्मानाबाद जिल्हा कॅरीबॅगमुक्त करण्यास हातभार लावावा. या उपक्रमात शहरी व ग्रामीण भागातील महिला बचत गटाने सहभाग घेऊन आपली आíथक उन्नती साधावी. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय कागदी पिशवीबरोबरच कापडी पिशव्याही विक्रीसाठी तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या.
या उपक्रमात राधाकृष्ण महिला बचत गट-सांजाबेस, यश महिला बचत गट-भीमनगर आणि अंकिता महिला बचत गट-तांबरी विभाग यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. या बचत गटामार्फत २५० ग्रॅमपासून ते २ किलोपर्यंत साहित्य बसेल अशा क्षमतेच्या कागदी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येकी १०० नगाला रुपये २०, ३० व ३५ अशी किंमत ठेवण्यात आली आहे. या वेळी या कागदी पिशव्यांची व्यापाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केली.