आणीबाणी हे काँग्रेसचं लोकशाही पायदळी तुडवण्याचं लांच्छनास्पद कारस्थान असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. आणीबाणी लागू केल्याला ४६ वर्षे आज पूर्ण झाली आहे.

त्यांनी याबद्दल केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “‘गरीबी हटाव’च्या घोषणा हवेतच विरल्या. दारिद्र्य निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली आणि याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले”.


या ट्विटसोबतच चंद्रकांत पाटील यांनी एक फोटोही शेअऱ केला आहे. ज्यात लिहिलं आहे, “आणीबाणी- भारतीय लोकशाहीला पायदळी तुडवण्याचे काँग्रेसचे लांच्छनास्पद कारस्थान. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उद्धवस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली आणि सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र ‘गरिबी बढाव’च्या दिशेनेच कृती केली”.

हेही वाचा- 46 years of Emergency: “तो काळा दिवस विसरता येणार नाही” नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आणीबाणीचा निषेध करत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करुया ”


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, १९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती.
ते म्हणाले, “असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द प्रेक्षक बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे. २१ महिने निर्दय शासनाचे क्रौर अत्याचार सहन करत देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम.”

आणीबाणीवर टीका करताना भाजपा नेत्यांनी #DarkDaysOfEmergency असा हॅशटॅगही वापरला आहे.