राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या व राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल(बुधवार) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया उमटली. प्रशासन आणि पोलीस दलातील काही अधिकारी भाजपला मदत करीत असल्याने अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी झाली. तर, या घटनांमुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत सापडल्याचं दिसत आहे. यावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कालच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही !” अहो उद्धवजी. राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे ! असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. कालच्या कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, “आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही !” अहो उद्धव जी. राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे ! @OfficeofUT pic.twitter.com/TgsuUgw8O0 — Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 25, 2021 याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवरून ट्विटद्वारे ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. “राज्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांचं काय वैर आहे देव जाणे? शेतकरी ठाकरे सरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना आपली व्यथा सरकारच्या दारी मांडून मदतीची याचना करण्याऐवजी त्यांना जीव देणं जास्त सोपे वाटतंय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?” असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. बुलेट ट्रेन व वाढीव वीज बिल - “केवळ आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मुंबईच्या मेट्रोचा खेळखंडोबा केला. मुंबईतील चाकरमान्यांना दिवसभर काम करून पुन्हा त्याच वाहतूक कोंडीचा नाहक त्रास तुमच्यामुळे सहन करावा लागतोय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का ? करोना महामारीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गोरगरीब जनतेला दिलासा देण्याऐवजी तुमच्या सरकारने त्यांना वाढीव वीजबिलाचा झटका दिला आणि ते भरू न शकणाऱ्या गोरगरीब जनतेचे वीज कनेक्शन खंडित केले. या मोगलाईची तुम्हाला खंत वाटत नाही का?” असंही चंद्रकांत पाटील यांनी विचारलं आहे. केवळ आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी @OfficeofUT तुम्ही मुंबईच्या मेट्रोचा खेळखंडोबा केला. मुंबईतील चाकरमान्यांना दिवसभर काम करून पुन्हा त्याच वाहतूक कोंडीचा नाहक त्रास तुमच्यामुळे सहन करावा लागतोय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का ? pic.twitter.com/l3oNf5sae8 — Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 25, 2021 मराठा आरक्षण - “विदर्भ- मराठवाडा महाराष्ट्राचा भाग नसल्यासारखे तुमचे सरकार वागत आहे. या सरकारला विदर्भ-मराठवाड्याचा एवढा द्वेष का आहे? विदर्भ-मराठवाडा वैधानिक महामंडळ ते सर्वच प्रकारच्या विकासाच्या बाबतीत या सरकारने विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय केला. तुम्हाला याची खंत वाटत नाही का ?मराठा समाजाला अथक परिश्रमाने मिळालेले आरक्षण उद्धव ठाकरे तुम्ही आपल्या कर्मदरिद्रीपणामुळे गमावले. अनेक मराठा तरुण-तरुणी तुमच्या या मूर्खपणाची शिक्षा भोगत आहेत. तुम्हाला याची खंत वाटत नाही का?” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केला. मराठा समाजाला अथक परिश्रमाने मिळालेले आरक्षण @OfficeofUT तुम्ही आपल्या कर्मदरिद्रीपणामुळे गमावले. अनेक मराठा तरुण-तरुणी तुमच्या या मूर्खपणाची शिक्षा भोगत आहेत. तुम्हाला याची खंत वाटत नाही का ? pic.twitter.com/xnUmtWgF7Q — Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 25, 2021 महिला अत्याचार - “राज्यात दिवसागणिक महिला अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. तुमच्या सरकारमधील मंत्र्यांवरच महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. तुम्ही स्वतः एका मंत्र्याची या आरोपामुळे मंत्रिपदावरून गच्छन्ति केली आहे. राज्य महिला अत्याचाराचे विक्रम रचत आहे, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?” असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.