केंद्र सरकारने खताच्या किंमती वाढवल्यानंतर त्याचे कृषी क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री संदानंद गौडा यांना पत्र दिलं होतं. पवार यांच्याबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गौडा आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तौमर यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

“खत उत्पादक कंपन्यांनी गेल्या काही दिवसात खताच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे पडणारा बोजा ध्यानात घेऊन शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली.

“गेले वर्षभर करोना महामारी आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच खत उत्पादक कंपन्यांनी खताची किंमत वाढविल्यास शेतकऱ्यांसाठी अधिकच नुकसानकारक ठरेल. मान्सून काही दिवसांवर आला असून, शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. हे ध्यानात घेता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खताच्या खरेदीसाठी लवकर अनुदान घोषित करावे,” असं पाटील यांनी मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, असंही पाटील म्हटलं आहे. भाजपाचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनाही पाटील यांनी पत्र पाठविले असून, शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान जाहीर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.