“आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारसह सगळ्यांचं लक्ष राज्यातील एका महत्त्वाच्या विषयाकडे वेधून घेतलं आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत राज्यात झालेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा हवाला देत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? हे कधीपर्यंत असंच चालणार? असे सवाल करत पाटील यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील ट्विटमध्ये काय म्हणाले?

“आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार?,” असे प्रश्न पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना केले आहेत.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून १२ मार्चपर्यंत घडलेल्या महिला अत्याचाराच्या काही घटनांकडेही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्र ठरतोय गुन्ह्यांची राजधानी अशा मथळ्याखाली हा काही घटनांचा उल्लेख पाटील यांनी केला आहे.

२ मार्च- जम्बो कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून महिलेचा विनयभंग.
३ मार्च- औरंगाबादमध्ये करोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न.
४ मार्च – जळगावमध्ये पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचवलं.
६ मार्च – शिक्षिकेचा विनयभंग करून तिला धमकी देण्यात आली.
७ मार्च -पैशांसाठी विवाहितेचा छळ.
८ मार्च – महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केला.
११ मार्च – ७ महिन्यांच्या बाळासह महिलेची गळफास लावून आत्महत्या.
१२ मार्च -पित्याकडून मुलीवर अत्याचार.
राज्यातील या घटनांचा उल्लेक करत “हे कधीपर्यंत असंच चालणार?” असा सवाल पाटील यांनी राज्य सरकारकडे केला आहे.