समन्वयातून जागांची अदलाबदल

भाजपा आणि सेना युती होणारच आहे. आम्ही समन्वयातून जागांची अदलाबदल करणार आहोत. राज्यात भाजप-सेना युती हाच एक पक्ष आहे. त्यामुळे माध्यमातून येणाऱ्या भाजप-शिवसेना युती तुटणार या बातम्या खोटय़ा आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

वाई नगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व विजय संकल्प बूथ संमेलनात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले, नगराध्यक्ष डॉ प्रतिभा शिंदे, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, काहीही झाले तरी भाजप-शिवसेना युती तुटणार नाही. अनेक जागांची अदलाबदल करावी लागेल. ती आम्ही समन्वयातून करू. वाई विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी तो भाजपाला मिळावा यासाठी मुख्यमंत्री व मी स्वत: प्रयत्न करत आहोत. भाजपला हा मतदारसंघ मिळेल आणि मदन भोसले खूप मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील याची मला खात्री आहे. सध्या राज्यात भाजपमध्ये सामील होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खूप मोठय़ा अपेक्षेने भाजपचा जनाधार वाढत आहे. पुढच्या आठ दिवसात राज्याच्या राजकारणात आणखी बदल होतील. खूप मोठय़ा मतांनी भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार आम्ही निवडून आणणार आहोत.

पाटील म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने केलेली विकासकामे आम्ही मतदारांसमोर मांडत आहोत. त्यामुळे आम्हाला वेगळ्या प्रचाराची गरज नाही. महाबळेश्वर-पाचगणी या पर्यटनस्थळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून उभारण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी या वेळी मदन भोसले केली. तसेच वाई शहरातील विविध विकास कामांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी आणत आपण बदल घडवणार असल्याचेही ते म्हणाले.