छगन भुजबळांबद्दल वक्तव्य केल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मुश्रीफ यांच्या इशाऱ्याला चंद्रकांत पाटील यांनी आज उत्तर दिलं. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचं आव्हान देत 'मुश्रीफ जिंकले, तर त्यांना मलाच विकावं लागेल,' असा टोला त्यांनी लगावला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पाटील म्हणाले,"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललं पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावेत. गायकवाड आयोगाने ज्या निष्ठेने काम केले, तसेच काम आताही झाले पाहिजे, असा सल्ला पाटील यांनी दिला. मुश्रीफांच्या इशाऱ्यावर पाटील काय म्हणाले? "हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली, तरी १०० कोटी काय १ कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला, तर त्यांना मलाच विकावं लागेल," असं पाटील म्हणाले. 'तुम्ही जामिनावर बाहेर आहात, त्यामुळे सांभाळून बोला,' असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावर हसन मुश्रीफ यांनी आक्षेप नोंदवला होता. 'लोकशाहीमध्ये अशाप्रकारे धमकावणे योग्य नाही. गेल्यावेळीही चंद्रकांत पाटील यांनी आमचा अपमान केला होता. त्यामुळे आता मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहे,' असं मुश्रीफ म्हणाले होते.