चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये 15 तालुक्यात काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील 307 नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जवळपास 25 वाहनांची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून हे सर्व व कामगार लखनऊकडे रवाना झाले आहेत.

नागपूर ते लखनऊपर्यंत एका विशेष ट्रेनने आज त्यांना रवाना करण्यात आले. विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी या संदर्भात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना आपापल्या जिल्ह्यातील उत्तर प्रदेशातील मजूर वर्गाला पाठविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात जिल्हाभरात नियोजन करण्यात आले होते.

उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजता नागपूर येथून रवाना झालेल्या या विशेष रेल्वेमध्ये चंद्रपूर तालुक्यातील 84, राजुरा 22, भद्रावती 18, मुल 47, गोंडपिंपरी 29, गडचांदूर 12, सावली 10, जिवती 13, वरोरा 2 व बल्लारपूर येथील 70 अशा एकूण 307 मजुरांना रवाना करण्यात आले. यामध्ये 289 मजुरांचा समावेश होता इतर त्यांची मुले असे एकूण  307 जण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या मजुरांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी मदत केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मजुरांनी स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहे.