मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, तसेच पाण्याची टाकी, मंत्रालयात बसवलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले. मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, असे असूनही कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देश मेहता यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली.

पाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आरओ यंत्र बसविले आहेत, त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा होतो त्यांची देखील तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. मंत्रालयाच दुषित पाण्यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उलट्या आणि पोटात दुखण्यासारखे त्रास होत असल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, राज्याच्या अनेक भागांमधून मागरिक कामानिमित्त मंत्रालयात येत असताता. अशा परिस्थितीतही पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मंत्रालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला.