अतिविषारी तणनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यतील अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर रासायनिक खते व तणनाशकांच्या अतिवापराबद्दल पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू झाली आहे. दुष्काळी भागातील शेतकरी त्याचा सर्वाधिक वापर करतात, असा आजवरचा समज होता. मात्र रासायनिक खतांच्या वापरात तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्यांच्या काठावरील जळगाव जिल्हा राज्यात प्रथम तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गोदाकाठचा सुपीक भाग असलेला नाशिक जिल्हा तणनाशकांच्या वापरात महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती कृषी विभाग व केंद्र शासनाच्या बी-बियाणे व खत, कीटकनाशक वापरावर निरीक्षण ठेवणाऱ्या व्यवस्थेतील आकडेवारीतून (फर्टिलायझर मॉनिटरिंग सिस्टीम) समोर आली आहे. जळगावच्या केळी व कापसाचा डंका केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाजतो. तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्यांच्या काठावरील जमीन सुपीक असली तरी गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे या कसदार जमिनीवरील पिकांना विविध कीडरोगांनी ग्रासले आहे. कृषी विभागाच्या माहिनीनुसार व केंद्र शासनाच्या ‘फर्टिलायझर मॉनिटिरग सिस्टीम’च्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्हा हा रासायनिक खतांचा वापर करणारा राज्यातील प्रथम तर देशातील दुसऱ्या क्रमांकावरील जिल्हा आहे. जळगाव जिल्हय़ात दर वर्षी खरीप व रब्बी हंगामात सरासरी ५ लाख ३० हजार मेट्रिक टन खतांचा वापर होतो. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे येथे जमीन नापीक होत चालली असून उत्पादनदेखील घटत आहे. पिकांवर विविध प्रकारांच्या कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तणनाशकांचा वापरही मोठय़ा प्रमाणात वाढू लागला आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी या संदर्भात माहिती दिली. त्यानुसार जळगाव जिल्हय़ात खरिपाचा सरासरी ७ लाख ५० हजार तर रब्बीचा एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा होतो. खरीप हंगामात सर्वाधिक म्हणजे ४ लाख ५० हजार क्षेत्रावर कापसाचा पेरा होतो. यासाठी दर वर्षी सुमारे २० लाखहून अधिक बियाणे पाकिटांची गरज भासते. उर्वरित क्षेत्रफळावर ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, तूर, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, भूईमुग, उसाचा पेरा होतो. दोन्ही हंगामात सरासरी पाच लाख मेट्रिक टनहून अधिक रासायनिक खतांचा वापर एकटय़ा जळगावमध्ये होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. हा वापर महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे ते म्हणाले. तणनाशकाच्या वापरात नाशिकपाठोपाठ जळगाव जिल्हय़ाचा क्रमांक लागतो. येथे कपाशीसह केळी, पपई, सोयाबीन व इतर पिकांसाठी त्याचा वापर होऊ लागला आहे. जिल्हय़ात रावेर, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा येथे तणनाशकांचा अधिक्याने वापर होतो. जिल्हय़ात यंदा सुमारे एक लाख लिटर एवढय़ा तणनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी केल्ांा असून त्याची किंमत चार कोटींवर असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी, बाजरी, ऊस, मका या एकदल पिकांमधील द्विदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत. तर कपाशी, सोयाबीन, तूर आदी द्विदल पिकांमधील एकदल तण नष्ट करणारी तणनाशके वापरली जात आहेत.