|| हर्षद कशाळकर प्रशासकीय यंत्रणाही उदासीन रसायनी येथील एचओसी कंपनी गॅस गळती होऊन माकडं आणि प्राण्यांचा मृत्यू, पेण खारपाडा येथे कंटेनरमधून झालेले गॅस गळती, महाड एमआयडीसीत दोन दिवसांत घडलेल्या दुर्घटना, बुधवारी कशेडी घाटात झालेला अपघात, यामुळे रासायनिक पदार्थाची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र सध्या रायगड जिल्ह्य़ात पाहायला मिळते आहे. कोकणात रासायनिक प्रकल्पांना होणारा विरोध किती योग्य आहे. हे देखील यामुळे अधोरेखित झाले आहे. रायगड जिल्ह्य़ात गेल्या तीन वर्षांत वायुगळतीच्या १० दुर्घटना झाल्या, त्यात दोन जणांचा बळी गेला तर १६ जखमी झाले. या शिवाय ३१ माकडांचाही आणि अनेक पक्ष्यांचाही घातक वायुगळतीने मृत्यू झाला. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास खारपाडा येथे टँकर पलटी होऊन गॅसगळती झाली. यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास १२ तास विस्कळीत होती. गेल्या वर्षभरात रसायन वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात होण्याची ही तेरावी घटना होती. महाड एमआयडीसीत शनिवारी पुन्हा एकदा वायू गळती झाली. तर रविवारी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. ज्यामुळे रासायनिक द्रव्यांचा धूर सर्वत्र पसरला. सातत्याने होणाऱ्या या घटना संभाव्य धोक्याची सूचना देत आहेत. मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणाचे दुर्लक्ष होत आहे. जुजबी बठका, शासकीय फतव्यांचे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच होताना दिसत नाही. रासायनिक अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे गुन्हे दाखल केले जातात. पण तांत्रिक माहिती आणि तपास कसा करावा, याचे ज्ञान नसल्याने पुढील कारवाई होत नाही. रासायनिक कंपन्यांची सुरक्षा तपासणी योग्य प्रकारे केली जात नाही. सुरक्षेची मानकेही पाळली जात नाहीत. अनेक रासायनिक कंपन्यांमध्ये पूर्ण वेळ कंपनी सुरक्षा अधिकारीच कार्यान्वित नसतो. कंत्राटी पद्धतीने या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक पदार्थाची वाहतूक करताना सुरक्षेचे उपाय कितपत पाळले जातात. हा मोठा संशोधनाचा विषय ठरतो. कारण जे ट्रक चालक या रसायनांची वाहतूक करतात ते स्वत: या रसायनांच्या बाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे रसायनांच्या ट्रकला अपघात झाला, तर ते सर्वात आधी तिथून पळ काढतात. वास्तविक पाहता रासायनिक अपघाताची तात्काळ माहिती स्थानिक प्रशासनाला देणे गरजेचे असते. यामुळे आसपासच्या नागरिकांना तात्काळ सतर्क करून स्थलांतरित करता येऊ शकते. त्यानंतर तो परिसर रिकामा करून तज्ज्ञांच्या मदतीने गळती रोखण्याचे काम केले जाऊ शकते. मात्र अनेकदा वायुगळतीच्या दुर्घटना घडूनही स्थानिकांना याबाबत सूचितही केले जात नाही. यामुळे धोक्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. भोपाळ येते युनियन कार्बाईड या कंपनीतील वायुगळतीने देशात रासायनिक कंपन्यांचा धोका पहिल्यांदा अधोरेखित झाला होता. पण या अपघातानंतरही प्रशासकीय यंत्रणांनी योग्य बोध घेतला नसल्याचे वारंवार होणाऱ्या या घटनावरून दिसून येत आहे. कोकणात येऊ घातलेल्या अणुऊर्जा आणि रिफानरी उद्योगांना स्थानिकांचा विरोध होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. कंपनी आणताना सुरक्षेची हमी दिली जाते. नंतर मात्र सुरक्षेचे नियम कंपन्याकडून धाब्यावर बसविले जातात हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शासनाने रासायनिक कंपन्यांमध्ये होणाऱ्या आणि रसायन वाहतुकीत होणाऱ्या अपघातांविरोधात कठोर पावले उचलण्याची वेळ आता आली आहे; अन्यथा भोपाळची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ‘रासायनिक पदार्थाची वाहतूक बंद करणे शक्य नाही. पण ती कशी सुरक्षित होईल यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध विभागात समन्वय रहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रासायनिक पदार्थाची वाहतूक करताना अपघात झाल्यास नागरिकांना तातडीने घटनास्थळापासून दूर जाणे आणि सुरक्षा यंत्रणांना याबाबतची सूचना देणे गरजेचे असते. यामुळे अपघातांची तीव्रता कमी येऊ शकेल.’ - सुरेश वऱ्हाडे, पोलीस निरीक्षक वाहतूक, शाखा रायगड ‘रासायनिक पदार्थाची वाहतूक नागरिकांसाठी धोकादायक आहे. पण ही वाहतूक रोखणे शक्य नाही. त्यामुळे रसायन वाहतुकीसाठी ठरावीक वेळ निश्चित करण्यात यावी, आणि ही वाहतूक करताना सुरक्षात्मक उपाययोजनांची काटोकोरपणे अंमलबजावणी व्हावी.’ - दिलीप जोग, अध्यक्ष, वेल्फेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर्स ऑफ कोकण