सत्तेत असूनही भाजपला सातत्याने विरोध करणाऱ्या शिवसेनेला टोमणा मारण्याची संधी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी साधली. राज्यातील वाघांच्या गणनेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नामध्ये भुजबळ यांनी प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन व्याघ्रदूत झाल्यावर राज्यातील वाघांची संख्या वाढली की वाघिणीची, असा प्रश्न उपस्थित केला. त्याला जोडूनच त्यांनी राज्यातील वाघांचे जे गुरगुरणे चालू आहे, ते कधी बंद होईल, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
या प्रश्नाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, वाघांचे गुरगुरणे सुरू असल्यामुळेच सरकारने त्यांच्यासाठी संवर्धन आणि संरक्षणाचे काम सुरू केले आहे. आता राज्यातील वाघांची संख्या वाढली की वाघिणींची याची माहिती घेण्यासाठी सरकार छगन भुजबळ यांची एक सदस्यीय समिती नेमण्याचा विचार करीत आहे. मुनगंटीवार यांच्या या उत्तरानंतर सभागृहात हशा पिकला…