सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस तूर्तास स्थगिती दिली आहे. स्थगिती दिलेली असतानाच राज्य सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस भरतीच्या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. सरकारनं १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवाव्यात अशी मागणी आधी करण्यात आली होती. त्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भरतीचा निर्णयचं मागे घेण्याची सूचना सरकारला केली आहे. “मराठा समाजाच्या १३ टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे,” असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

राज्यात पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंत्रिमंडळानंही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीस स्थगिती दिली असल्यानं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे भरतीला विरोध होऊ लागला आहे.

आणखी वाचा- “…तर मी खासदारकीचा राजीनामा देणार,” उदयनराजेंचा इशारा

या संदर्भात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भूमिका मांडली आहे. “आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या १३ टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे,” असं संभाजीराजे म्हणाले.

“यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एमपीएससी’ची किंवा आणखी कुठलीही असो. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको. सरकारने पोलीस भरतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. ही समाजाच्या वतीने विनंती वजा सूचना आहे,” असा इशाराही संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.

आणखी वाचा- मराठा समाजानं आंदोलन करू नये हे सांगण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाही : नारायण राणे

आणखी वाचा- पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवण्याची मागणी; ठाकरे सरकारने स्पष्ट केली भूमिका

मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सर्व समाज मराठा समाजाच्या सोबत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने प्राधान्य द्यावं, हीच भूमिका घेतली आहे. त्यांचे मी समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो,” अशा शब्दात संभाजीराजे यांनी आभार व्यक्त केले आहेत.