सारथी संस्थेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि संस्थेची स्वायतत्ता आदी विषयावरून वाद सुरू होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सारथीला उद्यापर्यंत आठ कोटी रुपये देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच तासांत सरकारनं निधी संस्थेला सुपूर्द केला. त्यावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर दोन तासातच शासनानं ८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. त्यानंतर हे पत्र ट्विट करत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. “सारथी! दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला . सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करून घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने उभारलेली ही संस्था सर्वार्थाने लोक कल्याणकारी ठरेल असा विश्वास आहे,” अशा भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या.

ठाकरे सरकारनं शब्द पाळला…

अजित पवार यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. “सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनामध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे आठ कोटी रुपयांची मदत देतील,” असं अजित पवार म्हणाले.