मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं काल (९ सप्टेंबर) महत्त्वाचा निर्णय दिला. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देतानाच न्यायालयानं हे प्रकरण पाच सदस्यीय खंठपीठाकडे सोपवलं. मात्र, आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्यानं त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना सरकारला इशारा दिला आहे. निकालानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. "आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अपेक्षा आहे," असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे. आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. pic.twitter.com/89HOaJHi9f — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) September 9, 2020 "मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल," असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.