करोना नियमांचे पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊदे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मांसाहेबांसमोर आज शिवजयंतीदिनी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्यांना मानाचा मुजरा करत त्रिवार वंदन केले.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे असेही अजित पवार म्हणाले. स्वराज्यातील मावळ्यांच्या शौर्याला, त्यागाला, राष्ट्रभक्तीला वंदन करताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या युवा शक्तीला, आधुनिक मावळ्यांना वंदन करतानाच महाराष्ट्रातल्या तमाम बंधु-भगिंनीना, जगभरातल्या शिवभक्तांना शिवजयंतीच्या अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.