ढोल ताशे, लेझीम, पोवाडय़ांच्या गजरात मुरुड जवळील पद्मदुर्ग किल्याचा जागर सोहळा संपन्न झाला. मुरुड नगर परिषद आणि कोकणकडा मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला राज्यातील विविध भागातून आलेल्या दुर्गप्रेमींनी हजेरी लावली. दुर्लक्षित किल्ल्याच्या संवर्धनाकडे शासनाचे लक्ष वेधले जावे आणि वैभवशाली ऐतिहास लाभलेल्या किल्ल्यांची जनसामान्यांना ओळख व्हावी. हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सकाळी १० वाजता या सोहळ्याची सुरुवात झाली. जागराच्या सुरुवातीला उपस्थितांना पद्मदुर्ग दर्शन व माहिती देण्यात आली. यानंतर अॅड. महेश मोहिते, विजय पाटील, संदीप वाघपंजे, शेखरमामा फरमन यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन आणि दुर्गपूजन करण्यात आले. यानंतर राज्यातील विविध भागांतील आलेल्या शाहिरांनी शिवमहिमा सांगणारे पोवाडे सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर व्याख्याने झाली. जागराच्या शेवटच्या सत्रात शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मावळ्यांच्या वेशात अनेक मावळे यात सहभागी झाले. शिवछत्रपतींच्या जयघोषाने यावेळी गडाचा परिसर दणाणून सोडला. ढोलताशे, नगारे, लेझीम यांच्या गजरात महाराजांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पथकाने पारंपरिक देवीचा गोंधळ सादर केला यावेळी गोंधळीच्या संबळ व ढोलकीच्या तालावर अनेक पर्यटकांनी दिवट्या घेऊन पारपारीक नृत्य केले. शेवटी पद्मदुर्गाच्या तटबंदीवरून छत्रपती शिवाजी महाराजांची शाही पालखी मिरवणूक काढण्यात आली. स्वराज्याच्या मजबूत बांधणीत अरबी समुद्रातील आरमारी सत्ता काबीज करण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांनी पद्मदुर्ग या जलदूर्गाचे बांधकाम करवून घेतले. रायनाक भंडारी याच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा दुर्ग बांधला गेल्याचे इतिहासातील दाखल्यावरून समजते. या जलदुर्गामुळे छत्रपतींना जंजिऱ्यावर करडी नजर ठेवता आली. जंजिरा घेता आलं नाही हे शल्य असले तरी समुद्रात अशा प्रकारचा जलदुर्ग बांधण्याचं कौशल्य छत्रपतींनी दाखवून दिले. या किल्ल्याचे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. जे हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांना उपयोगी पडले. पण दुर्दैवाने याकडे खूपच दुर्लक्ष झाले. ऐतिहासिक किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी दुर्गप्रेमींनी केली. पद्मदुर्ग किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना उतरण्यासाठी जेटी उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी गरसोय होत असते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक आमदार महेंद्र दळवी आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मदतीने तात्पुरत्या तरंगत्या जेटीची उभारणी करण्यात आली होती. प्रकाश सरपाटील व अशील ठाकूर आणि कोळी बांधवानी यासाठी खूप महेनत घेतली होती. त्यामुळे यंदा गडावर येणाऱ्या पर्यटकांना गडावर उतरणे आणि चढणे सोपे झाले होते. आगामी काळात किल्ल्यावर सुसज्ज जेटी उभारली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.