राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकाडाउनबाबत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करणार आहेत. या अगोदर वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाउनचा इशारा देखील दिला गेलेला आहे. शिवाय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्यात लॉकडाउनची शक्यता वर्तवलेली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री काही निर्णय जाहीर करण्या अगोदर राज्यातील प्रमुख विरोधी भाजपाने आता मुख्यमंत्र्यांवर यावरून निशाणा साधल्याचे दिसत आहे.

लॉकडाउनची आज रात्री होणार घोषणा?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार संवाद

“लॉकडाउन होणार या विचारानेच सामान्य माणूस हतबल झाला आहे.सगळ्याच गोष्टींवर निर्बंध अटी असतील तर,माणसाने पाणी पिऊन जगायचं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपाययोजनांची एवढी तारांबळ उडालेली असताना लॉकडाउनचा विचारच कसा करू शकता तुम्ही? सामान्य गरजांची व्यवस्था करा नंतर लॉकडाउनचा विचार करा ठाकरेसाहेब…” असा सवाल भाजपाकडून करण्यात आला आहे.

तसेच, “राज्याचे अर्थचक्र आणि हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांसाठी लॉकडाउन हा पर्याय नेहमी असू शकत नाही हे ठाकरे सरकारने लक्षात घ्यावे. त्यापेक्षा सरकारने करोनाचे नियम आणखी कठोर करून आरोग्य सुविधा वाढवाव्या.” अशी देखील मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे.

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील – अस्लम शेख

लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याला आज दुजोरा दिलेला आहे. “विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार.” असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.