गेल्या साधारण दीड वर्षापासून करोना सध्या देशात थैमान घालत आहे. वेगात पसरणारा, व्यक्तीपरत्वे, कालपरत्वे आपलं रुप बदलणाऱ्या या विषाणूपासून देशवासीयांपासून सगळेच, अगदी संशोधक, शास्त्रज्ञही अनभिज्ञ होते. तरीही करोनाशी आपण खंबीरपणे आणि यशस्वी लढा देत आहोत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही करोना परिस्थिती उद्भवल्यावर त्यांच्यासमोर असलेली आव्हानं, त्यांची मनस्थिती याबद्दल भाष्य केलं आहे. निमित्त होतं सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या करोना परिस्थितीवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचं. म्हैसेकर यांनी कोविड मुक्तीचा मार्ग असं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी करोना परिस्थितीशी लढतानाच्या त्यांच्या मानिकतेबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, मला कोणताही व्यवस्थापनाचा अनुभव नाही, राज्यकारभाराचा अनुभव नाही, तरीही मला राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून मी अजून वाटचाल करतो ना करतो, तोच हे करोनाचं संकट पुढे येऊन ठाकलं. ज्याला आत्तापर्यंत फक्त टीव्हीत, बातम्यांमध्ये पाहिला होता, आता तोच विषाणू, आजार आपल्या राज्यात येऊन पोहोचला आहे. तेव्हा मला काही कळत नव्हतं, काय करावं, काय निर्णय घ्यावा, काय सुरु करावं, काय बंद करावं. आजही फार काही कळतं असं नाही. पण त्यावेळी केंद्राच्या सूचनांनुसार काम सुरु झालं आणि लॉकडाउनचा पर्याय समोर आला. पण बंधनं कोणालाच आवडत नाहीत, सगळ्यांना स्वातंत्र्य प्रिय, बंधनं सर्वात नावडती असतात. दिपक म्हैसेकर यांच्या कामाचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, दिपक सेवानिवृत्त झाले. आम्ही साधारण एकाच वयाचे असू. सेवानिवृत्तीच्या वयात माझ्यावर राज्याची जबाबदारी आली. पण सेवानिवृत्त झालात म्हणून तुम्ही काम थांबवलं नाही. कोविडच्या काळातही काम करत राहिलात. या मागोवा न लागू देणाऱ्या विषाणूचा पाठलाग केला आणि कोविड मुक्तीचा मार्ग दिलात.