अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे मत लातूर : संसदेने मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा शरणार्थी हिताचा असून घुसखोरांविरोधात कारवाई करणारा आहे. देशातील रहिवाशांचे या कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. जे नागरिक वर्षांनुवर्षे देशात राहात आहेत त्यांना या कायद्यामुळे कसलाही धोका नाही, तर ज्यांनी घुसखोरी केलेली आहे त्यांना मात्र या कायद्यामुळे देश सोडावा लागणार आहे, असे मत प्रसिध्द अभिनेते दलितमित्र राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने दयानंद सभागृहात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. परिषदेचे लातूर शाखेचे अध्यक्ष विश्वास लातूरकर, सचिव सुनील पाटील, कार्यक्रम प्रमुख सुधाकर जोशी व संतोष पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सोलापूरकर म्हणाले,की हा कायदा कोणतीही जात आणि धर्माच्या विरोधात नाही. भाजपाने २०१४ सालच्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात हा कायदा लागू करण्याचे वचन दिले होते. हा कायदा बेकायदेशीर असता तर त्याच्या विरोधात त्याच वेळी तक्रार करता आली असती, पण अशी तक्रार कोणीही केली नाही. काँग्रेसनेही हा कायदा लागू करण्याचा विचार मांडला होता पण त्यांना कायदा लागू करता आला नाही. १९५५ साली तत्कालीन कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकत्व कायदा मांडला होता. त्याकाळी तो मंजूर झाला. आजवर त्या कायद्यात अनेक वेळा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, असेही ते म्हणाले. प्रारंभी खासदार सुधाकर श्रुंगारे यांनी सोलापूरकर यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सुधन्वा पत्की यांनी केले.