स्वच्छतेमध्ये देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा बहुमान (गौरव) आज सकाळी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा पुरस्कार बहाल करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्विकारला.

मुळातच सिंधुदुर्ग जिल्हा संस्कारी जिल्हा असल्याने स्वच्छतेबाबतची बिजे प्रत्येक नागरीकाच्या अंगी बाणलेली आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, शाहू, फुले, आंबेडकर, दलित वस्ती सुधार अभियान, साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धा, स्वच्छ आंगणवाडी पुरस्कार, निर्मल ग्राम अभियान अशा प्रकारच्या अभियानांमध्ये सिंधुदुर्गने जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर घवघवीत यश मिळवले आहे.

देशात स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या ७५ जिल्ह्य़ाचा सर्वे केंद्राच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने क्वॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत करण्यात आला होता. या मध्ये ५३ पठारी व २२ डोंगरी जिल्ह्य़ांचा समावेश होता. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाने १०० पैकी ९६.८ टक्के गुण मिळवत स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकाविला होता.तसे केंद्राने जाहीर केले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू उपस्थित होते. ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार संग्राम प्रभूगावकर व शेखर सिंह यांनी स्विकारला. पुरस्कार स्विकारण्यासाठी जि.प.चे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल बागल उपस्थित होते. सिंधुदुर्ग देशातील पहिल्या वर्षांत जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे. १०० टक्के साक्षर जिल्हा म्हणून या जिल्ह्य़ाची ओळख आहे. त्यातच स्वच्छ जिल्हा अशी आणखी एक ओळख निर्माण झाल्याने याचा फायदा जिल्ह्य़ाला पर्यटन वाढीसाठी होणार आहे.