राज्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. दिल्लीत झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत पुढील पाच वर्षात ‘हर घर को नल से जल’ ही योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

परभणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र शासनाच्या निकषानुसार गाव आणि शहरांमध्ये पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात प्रति व्यक्ती 20 लिटर पाणी दिले जाते. त्यामध्ये वाढ करण्यासाठी आढावा घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या पाच वर्षात अमृत योजनेच्या माध्यमातून बहुतांश शहरांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजना 40 टक्के पूर्णत्वास आल्या आहेत. लातूर मधील अमृत योजनेचे काम 90 टक्के झाले असून ऑगस्ट अखेर काम पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच राज्य शासनाची पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता असून ज्या योजना केंद्र शासनाच्या निकषात बसत नाहीत त्याचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करून पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान, परभणी शहराला पाणी पुरवठ्याच्या योजना सप्टेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील आणि शहरातील नागरिकांना प्रति व्यक्ती 135 लिटर पाणी दिले जाईल, अशी माहिती एका उपप्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली.