भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. आज शनिवारी मुख्यमंत्री यात्रेसाठी मूळ कार्यक्रमानुसार ठिकठिकाणी जमलेल्या लोकांना भेटतील. पण कोणतीही भाषणे होणार नाहीत किंवा हार स्वीकारले जाणार नाहीत, असे यात्राप्रमुख सुजितसिंह ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले की, अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी केवळ लोकांना भेटतील. पण कोठेही स्वागताचे कार्यक्रम होणार नाहीत. तसेच हार किंवा फुले स्वीकारण्यात येणार नाहीत. महाजनादेश यात्रा रविवारी पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल.