देशात तसंच राज्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली  असली तरी संपूर्ण लॉकडाउन हटवण्यात आलेलं नाही. दरम्यान, हा लॉकडाउन केव्हा उठवला जाणार याबाबत नागरिकांना प्रश्न पडला आहे. लॉकडाउन हटवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. “राज्यात लॉकडाउन उठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानंच राबवली जाणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. “करोनाचा धोका अद्यापही कायम आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही,” असंही ते म्हणाले. राज्य सरकारनं ३१ ऑगस्ट पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली होती.

“लॉकडाउनमधून कधी बाहेर येणार यापेक्षा लॉकडाउन कसं हटवणार हे महत्त्वाचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सटे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. तसंच लॉकडाउन उठवण्यासाठी घाई करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

करोनाची लागण कोणालाही होऊ शकते. या परिस्थितीमध्ये अतिआत्मविश्वास बाळगणं योग्य नाही. राज्यात करोनाची पहिली लाट येऊन गेली. परंतु आता दुसरी लाट येऊन द्यायची नाही. त्यामुळेच संपूर्ण लॉकडाउन उठवण्याऐवजी मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्यानं लॉकडाउन उठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.