करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे,मुंबई अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये करोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. या काळात बाहेरील राज्यातील अनेक नागरिक मुंबईत अडकले असून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यात आंध्र प्रदेशमधील काही कुटुंबांचा समावेश असून दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली असून मुख्यमंत्र्यांनीही  मदत करु, असं आश्वासन दिलं आहे.

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे परराज्यातून मुंबईत आलेल्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात आंध्र प्रदेशमधील काही कुटुंबांचा समावेश असून ते मुंबईतील गोमाहल्ली (पश्चिम) येथे अडकले आहेत. सध्या या कुटुंबांना अनेक अडचणी येत असून त्यांची मदत करावी यासाठी अभिनेता पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाची मदत करु, असं आश्वासन पवन कल्याणला दिलं आहे.


‘माननीय, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात लॉकडाउन केल्यानंतर मुंबईतील गोमाहल्ली (पश्चिम) येथे आंध्र प्रदेशमधील कुर्नूल जिल्ह्यातील अलूरु, अडोनी,मंत्रालयम,येम्मीनागनुर विधानसभा मतदार संघातील रोजंदारीवर काम करणाऱ्या ५०० पेक्षा जास्त कुटुंब अडकले आहेत. सध्या त्यांना मुलभूत गरजाही मिळत नाहीयेत. त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कृपया या नागरिकांची मदत करा’, असं ट्विट करत पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. विशेष म्हणजे त्यावर उद्धव ठाकरे यांनीही लगेच मदत करु असं सांगितलं आहे.

‘पवन जी, तुम्ही काळजी करू नका. या संकटाच्या काळात अडचणीत असलेल्या सर्वांची मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना त्वरित मदत पोचवली जाईल’, असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

हे ट्विट पाहिल्यानंतर पवन कल्याणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमधील चिंतेचं वातावरण अधिक गडद होतंय. परंतु या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र करकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.